चक्रव्युहात शिक्षण हे पुस्तक सर्व स्तरातील कार्यकर्त्यापर्यत पोहचले पाहिजे असे मत आ. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.
सत्ता आणि अधिकाराच्या पदावर आरुढ झालेल्या प्रत्येकाने आपला वेगळा उपक्रम शिक्षण क्षेत्रात राबविल्याने “एक ना धड भारभर चिंध्या अशी गत शिक्षण क्षेत्राची झाली आहे” अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली
गोरगरीब व बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या मार्गात निर्माण झालेल्या अडथळ्याची शर्यत दूर करण्यासाठी व्यापक जनजागरणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीचे नेते सुरेश पवार यांनी विविध शासकीय धोरणे, उपक्रम याचा शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम यावर नेमक्या शब्दात भाष्य करणारी लेखमाला “*चक्रव्युहात शिक्षण* ” या पुस्तक रुपाने प्रसिद्ध केली आहे.
स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळा व शिक्षकांना बदनाम करुन गोरगरीब समाजाला शैक्षणिक प्रवाहापासून दूर ढकलण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकारिता व अन्य मार्गाने समाजजागृती करणाऱ्या सर्व समाज घटकापर्यंत शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, वास्तव आणि त्यामागील कारणांची चिकित्सा पोहोचणे आवश्यक होते.
ती गरज या पुस्तकाने पूर्ण केली असून चक्रव्युहात शिक्षण हे पुस्तक बहुजन समाजाचे व ग्रामीण भागातील गोरगरीब वर्गाचे शिक्षण वाचविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या लढ्यासाठी दिशादर्शक आहे. म्हणून हे पुस्तक सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्या पर्यंत पोहोचले पाहिजे.
यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील, आ.रोहितदादा पाटील, शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे यांच्यासह सांगली जिल्हा परिषदेचे सर्व नूतन पदाधिकारी व जिल्ह्यातील शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.